![]() |
भुईमूग लागवड कधी करावी
|
भुईमुग हे तेलबिया वर्गीय पिकामध्ये एक महत्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.१७ लाख टन उत्पादन आणि ९६७ क्विं/हे एवढी उत्पादकता मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८५० लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१७ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १३७४ क्विं/हे अशी होती.
जमीन
मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पूर्व मशागत
एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
सुधारित वाण
पेरणीची वेळ
खरीप :१५ जून ते १५ जुलै उन्हाळी - १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, पेरणीचे वेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
बियाणे
भुईमूगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे. १०० किलो : एसबी - ११, टीएजी - २४, टीजी - २६, जेएल-५०१, फुले-६०२१ १२० ते १२५ किलोः फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी-४१, फुले उनप, फुले उन्नती, फुले भारती.
बीजप्रक्रीया
बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबीयम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे बीजप्रक्रीया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरावे.
पेरणी अंतर
दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी.ठेवावे. उन्हाळी हंगामात जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागुन उगवण चांगली होते.
आंतरपिके
खरीप भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफुल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपीके ६:२ या प्रमाणात भुईमूग + ज्वारी १:१ तर कपाशी १:१ या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकांमुळे अधिक आर्थिक फायदा होत असल्याचे प्रयोगाअंती दिसून आलेले आहे. भुईमूग + सोयाबीन (४:१) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) केल्यास पाने खाणारी अळीचे नियंत्रणास मदत होते. सुरु ऊसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपिक म्हणून लागवड करण्यासाठी ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून ऊसाची लागवड केल्यानंतर एक आठवड्याने १० सें.मी. अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस उन्हाळी भुईमुगाची लागवड करावी. भुईमूग + तीळ (४:१) या प्रमाणात आंतरपिक घ्यावे.
खत मात्रा
पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी १० टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. खत व्यवस्थापन (सुधारीत शिफारशीनुसार २०१३) भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० कि/हे (२०० कि/हे पेरणीवेळी तर उर्वरीत २०० कि/हे आऱ्या सुटतांना) जमिनीत मिसळुन द्यावे. महाराष्ट्रातील हमखास पावसाच्या विभागातील (२०१५ ची सुधारीत शिफारस) मध्यम काळ्या जमिनीत उन्हाळी भुईमुगाच्या अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर तसचे अधिक फायद्यासाठी ५ टन शेणखत प्रति हेक्टर पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर द्यावे. शिफारस खतमात्रेच्या १०० टक्के खते (२५:५०:०० नत्र, स्फुरद, पालाश किलो/हे.) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातुन ९ समान हप्त्यात द्यावे.
आंतर मशागत
पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.भुईमूगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करू नये. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरीता पेरणीनंतर लगेच पेंडीमिथॉलिन १.०० किलो क्रि.घ. प्रति हेक्टरी १० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी परसुट किंवा टरगासुपर १५ मिली व्यापारी उत्पादन/ हे १० लिटर पाण्यातून द्यावे .
पाणी व्यवस्थापन
खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस), आऱ्या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भुईमुग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी (आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.पीक बाष्पोपर्णोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी दिवसाआड द्यावे.
पीक संरक्षण
टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुभाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लि. पाण्यात मिसळून फवारावे. भुईमुग पिकावरील रस शोषणाऱ्या किडिंसाठी मिथिल डिमेटॉन २५ ई.सी. १० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पाने खाणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळी, अमेरिकन बोंड अळी यांचे बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० % प्रवाही २५ मिली १० ली. किंवा सायपरमेथ्रीन २५ ईसी ४ मिली १० लि. पाण्यात फवारावे.
काढणी व उत्पादन
पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी करावी. वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.